मराठी

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा. परीक्षाच नसत्या तर -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

परीक्षाच नसत्या तर

थोडक्यात उत्तर

उत्तर

परीक्षाच नसत्या तर

आम्ही मुले वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून शाळेत जातो. तेव्हापासून अभ्यास आणि परीक्षा आमची पाठच सोडत नाही. त्यामुळे ‘परीक्षाच नसली तर’ हा विचार येताच मनात गोड गुदगुल्या होतात. खरोखरच हा परीक्षेचा बागुलबुवा आम्हा मुलांच्या मागे लागला नाही तर जीवन किती सुसह्य होऊन जाईल आमचे. म्हणजे मला शाळेत जायला खूप आवडते. कारण शाळेतच माझे आवडते मित्र आणि मैत्रिणी मला भेटतात. त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करायला, खेळायला मला खूप खूप आवडते. माझ्या मनाला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला तर ती टोचणी मी माझ्या मित्रांजवळच व्यक्त करतो. शिवाय शाळेत आम्हाला वेगवेगळे विषय शिकवतात त्यामुळे जगाचे भरपूर ज्ञान आम्हाला मिळते. आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षकही खूप तळमळीने आम्हाला शिकवतात. त्यांना आमच्याबद्दल प्रेम आहे हे आम्हाला जाणवते. मधल्या सुट्टीत खाऊ खायला आणि शाळेच्या सहलींना जायला खूप मज्जा येते. दर वर्षी शाळेत क्रीडास्पर्धा होतात आणि वार्षिक स्नेहसंमेलनही होते. मी ह्या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेतो.

परंतु परीक्षा जवळ आल्या की मात्र आमचा सगळा उत्साह नाहीसा होतो. आमचे विद्यार्थी जीवन अगदी हिरमुसून जाते. शिवाय ह्या परीक्षासुद्धा अगदी पुष्कळ असतात. दर महिन्याची चाचणी परीक्षा, तिमाही, सहामाही, नऊमाही आणि वार्षिक अशाही परीक्षा मागे लागलेल्या असतातच. त्याशिवाय स्पर्धात्मक परीक्षा, अचानक वर्गात घेतलेल्या परीक्षा अशाही परीक्षा असतात. ह्या साऱ्या परीक्षांचा मनावर ताण येतो. घरातील मोठी माणसे तर येताजाता अभ्यासावरून बोलत राहातात. दहावीच्या मुलांना तर जीव नकोसा होऊन जातो ह्या काळात. परीक्षेच्या काळात मनावर ताण येतोच पण खेळायलाही मिळत नाही, सहली, हॉटेलात खाणे, टीव्ही बघणे सगळ्यावरच आफत ओढवते. शिवाय परीक्षेचे निकाल लागले आणि त्यात जर मनासारखे गुण नाही मिळाले तर आईबाबांची बोलणी खावी लागतात. आपला मान कमी होतो. नापास होऊन त्याच वर्गात बसावे लागणे म्हणजे तर फारच शरमेची गोष्ट असते.

परंतु परीक्षाच नसल्या तरी चालणार नाही. कारण मग आमच्या ज्ञानाची कसोटी लागणारच कशी? परीक्षाच नसेल तर कायमच सुट्टी असल्यासारखे वाटेल. मग त्या सुट्टीचाही कंटाळाच येईल ना. कारण पुष्कळ अभ्यास करून परीक्षा दिल्यावर त्यानंतर मिळणाऱ्या सुट्टीचा आनंद खराच अवर्णनीय असतो. त्याशिवाय परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर शाबासकी मिळते, त्या आनंदाचे काय? लहानपणी शाळेत दिलेल्या परीक्षा ही खरी तर पुढे जीवनात द्याव्या लागणाऱ्या परीक्षांची पूर्वतयारीच तर असते. त्यामुळे आपल्याला परिश्रम घेण्याची, मेहेनत करण्याची सवय लागते, आपली स्मरणशक्तीही त्यामुळे वाढते. म्हणून मला वाटते की परीक्षा ह्या हव्यातच. हल्ली सरकारने नियम काढला आहे की आठवीपर्यंत परीक्षा घेऊच नयेत. परंतु हा नियमघातक आहे असे मला वाटते. परीक्षा हव्यातच.

shaalaa.com
निबंध लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×